मुंबईत वांद्रे येथे झालेल्या भव्य कामगार मेळाव्यात झाली घोषणा
मुंबई : राज्यातील एक सर्वात जुनी आणि ‘इंटक’संलग्न कामगार संघटना ‘श्रमिक उत्कर्ष सभा’च्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री प्रसाद लाड यांची नियुक्ती झाल्याची घोषणा आज बुधवारी भव्य कामगार मेळाव्यात करण्यात आली. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभा आणि कामगार मेळाव्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली.
१५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘श्रमिक उत्कर्ष सभे’च्या विशेष सर्वसाधारण सभेचे आणि कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेचे नवीन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते व एकमुखाने श्री लाड यांची निवड करण्यात आल्याची घोषणा झाली. यावेळी संघटनेच्या इतर
पदाधिकारी व कार्यकारिणी मंडळाचीसुद्धा घोषणा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते श्री विजय कांबळे या मेळाव्याचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार असलेले श्री लाड यांची ‘श्रमिक उत्कर्ष सभे’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. आज सर्वच बाजूंनी कामगार नेतृत्त्वहीन झाला असताना श्री लाड यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून कामगारांचा आवाज बुलंद होण्यास मदत होईल अशीच प्रतिक्रिया उपस्थित कामगारांनी व्यक्त केली. श्री लाड हे भाजपचे विधान परिषदेतील प्रतोद असून पक्षाने त्यांची वसई विरार महानगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री लाड यांनी कामगारांच्या प्रश्नांवर अनेकदा विधिमंडळ आणि इतर व्यासपिठांच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.
“आज कामगार वर्ग हवालदिल आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशावेळी श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांची तड लावण्याचे आवाहन मला करण्यात आले. त्याला प्रतिसाद म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. मा. विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मी ही जबादारी स्वीकारली आहे. मी ज्येष्ठ कामगार नेते श्री विजय कांबळे यांचा खूप आभारी आहे. त्यांनी गेली तीन दशके जो वसा चालवला आहे तो पुढे नेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. केंद्रातील आमच्या सरकारच्या माध्यमातून अनेकानेक योजना कामगारांसाठी आणणे आणि इथल्या ठाकरे सरकारशी भांडून कामगारांचे हक्क त्यांना मिळवून देणे यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे उद्गार यावेळी श्री लाड यांनी यावेळी काढले.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्री प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे ही बाब महत्वाची मानली जात आहे. मुंबईत शिवसेनेला आणि शिवसेनेच्या कामगार संघटनांना त्यामाध्यमातून शह दिला जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
यावेळी बोलताना श्री विजय कांबळे म्हणाले, “आज कामगारांना श्री प्रसाद लाड यांच्यासारखा हरहुन्नरी, धडाकेबाज आणि आक्रमक नेता मिळणे ही काळाची गरज आहे. केंद्रातील पक्षाची सत्ता आणि राज्यातील सरकारशी लढण्याची तयारी यामुळे या संघटनेच्या माध्यमातून श्री लाड कामगारांसाठी भरीव काम करतील याबाबत माझ्या मनात यात्किंचितही शंका नाही.”