मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा होती. याबाबत शिंदे गटाने केलेले आरोप खोटे आहेत, असे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.दिलीप वळसे पाटील म्हणाले, सुरक्षेबाबत स्वत: एकनाथ शिंदे यांनी मागणी केली नव्हती. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मला एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत पत्र पाठवले होते. ते पत्र मी तात्काळ राज्याच्या पोलिस प्रमुखांकडे पाठवले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरवली होती. ठाकरे सरकारने शिंदे यांना सुरक्षा पुरवली नाही, हा शिंदे गटातील आमदार, खासदारांनी केलेला दावा पूर्ण खोटा आहे. तसेच, राज्याचा तत्कालीन सुरक्षा प्रमुख म्हणून मी हे पूर्ण जबाबदारीने सांगत असल्याचेही वळसे पाटील म्हणाले.
नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व तत्कालीन नगरविकासमंत्री, गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी शुक्रवारी केला. विशेष म्हणजे याला माजी कृषिमंत्री दादा भुसे, शंभूराज देसाई यांनीही दुजोरा दिला. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, असे आपल्याला सांगितल्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले होते.