ठाणे :
ठाण्यातील लघु उद्योजकांच्या संघटनेने संपकरी कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे हीत जपावे असे आवाहन करत ग्राहकांना वेठीस धरू नका अशी विनंती केली आहे. तसेच स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या या युगात दोन काय अधिकाधिक कंपन्या आल्या तरी कमी पडतील एवढी स्पर्धा निर्माण व्हायला हवी हे एक ग्राहक म्हणून आम्हाला वाटते असे म्हटले आहे.
ठाणे जिल्ह्यातील लघु उद्योजकांची संघटना म्हणून ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) काम करते. या संघटनेत जिल्ह्यातील हजारो उद्योजक सहभागी आहेत. त्यामुळे महावितरणचे घरगुती वीज ग्राहकांसोबत औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकही मोठ्याप्रमाणात आहे. संपकरी कर्मचाऱ्यांमुळे वीज पुरवठा खंडीत होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याचा औद्योगिक क्षेत्रात मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे टिसा या संघटनेने कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.वीज आयोगाकडे वारंवार धाव घेऊन आजवर वाटेल तशी दरवाढ ग्राहकांवर लादली गेली आहे. वीज वितरणामधील अनियमितता,व्यवस्थापनाकडून साहित्य पुरवठ्याची वानवा, पठाणी वसूली याला ग्राहक खरंच कंटाळला आहे. राज्यात काही ठिकाणी मुंबई व उपनगरे ,भिवंडी इत्यादी ठिकाणी वीजपुरवठा जवळजवळ त्याच दरात खाजगी कंपन्यांमार्फत होतो आणि तेथील ग्राहक असंतुष्ट आहेत का? तर याचे उत्तर नाही. मुंबईमध्ये जसे दोन-तीन वीज पुरवठादार आहेत त्यामुळे कधीच वीज कमी पडत नाही व अडचणी निर्माण होत नाही हा अनुभव आहे. त्याच धर्तीवर राज्यभर हे राबवायलाच हवे अशी एक ग्राहक म्हणून आमची सरकारला, आयोगाला व महावितरण कर्मचारी संघटनांना विनंती असल्याचे टिसाने म्हटले आहे.