नवी दिल्ली- देशात ६१ दिवसांपासून बंद असलेली अंतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ११७३ विमाने उडतील, ज्यातून सुमारे १८ हजार प्रवासी प्रवास करतील. पहिले विमान इंडिगोचे 6 ई 282 राहील. ते दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या टर्मिनल -३ वरून पहाटे ४.३० वाजता कोलकात्याकडे उड्डाण घेईल. मात्र, विमानसेवा सुरू करण्यावरून केंद्र आणि राज्यांत वाद निर्माण झाला आहे. सर्वाधिक संसर्ग असलेल्या महाराष्ट्र आणि तामिळनाडूने ३१ मेपर्यंत विमानसेवा सुरू करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्राने लॉकडाऊन अधिसूचनेत दुरुस्तीस नकार दिला आहे. ९ राज्यांनी या विमानांनी येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाइन ठेवण्याचे जाहीर केले आहे. यात पंजाब, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, आरोग्य सेतू अॅपमध्ये ग्रीन स्टेटस असेल तर क्वॉरंटाइनची गरज नाही.
तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे ऑगस्टपूर्वी सुरू करण्याचे संकेत मिळाले. नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शनिवारी फेसबुक लाइव्ह वेळी ही माहिती दिली. ते म्हणाले, ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकली नाही तरी काही प्रमाणात उड्डाणे सुरू करण्याचा प्रयत्न राहील. ही उड्डाणे सुरू होण्याची तारीख मी सांगू शकत नाही. मात्र, ही उड्डाणे ऑगस्टपूर्वी सुरू होतील. सर्वकाही सुरळीत राहिले तर जूनच्या मध्यात किंवा जुलैमध्येही उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. असे असले तरी देशात मालवाहू जहाजे आणि मालवाहू आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मप्रतून येणारे क्वॉरंटाइन : कर्नाटक
केरळ, कर्नाटक, आसाम, हिमाचल, आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरने म्हटले की, येणाऱ्या विमान प्रवाशांना ते १४ दिवस क्वॉरंटाइन करतील. कर्नाटकाने म्हटले की, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्यांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल. सात दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह अाल्यास, त्यांना घरीही सात दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल. तर केरळने म्हटले, या विमानातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल, मग ते कामासाठी एक-दोन दिवसांसाठी येत असतील तरी. जम्मू-काश्मिरात रस्ते, रेल्वे आणि विमानाने येणाऱ्या लोकांना क्वॉरंटाइन व्हावे लागेल. दिल्ली विमानतळाने म्हटले की, प्रवाशाच्या शरीराचे तापमान ९८.७ अंश असेल तर विमानतळात प्रवेश दिला जाणार नाही.
कंपन्या महाराष्ट्राची तिकिटे बुक करताहेत, अधिकारी म्हणाले – तिकिटे रद्द होतील
गोएअर वगळता जवळपास सर्व विमान कंपन्या २५मेपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांतील विमानांची तिकिटे बुक करत आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप देशांतर्गत विमानांना परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सद्य:स्थितीत विमानसेवा सुरू करता येणार नाही. ते म्हणाले की, कंपन्यांकडून बुक होणारी तिकिटे नंतर रद्दही होऊ शकतात. विशेष म्हणजे, राज्यात आंतरजिल्हा वाहतुकीवर बंदीनंतर नुकतीच रेल्वेने तिकिटेही रद्द केली होती. दरम्यान, डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.