आळंदी. देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला आळंदीतून पंढरपूरला एसटीने रवाना होतील. अवघ्या वीस व्यक्तींसोबत पोलिस बंदोबस्तात शिवनेरी बसद्वारे या पादुका पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला देण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांच्याकडे पादुका नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घातले आहे. एसटी बसमध्ये केवळ 20 जणांना बसण्याची परवानगी असणार आहे. यासोबतच फिजिकल डिस्टसिंगचे पालन करणए आवश्यक असणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने 30 जून रोजी दशमीला मार्गस्थ होतील. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेले आहेत.
सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजराने आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जात होती. मात्र यावर्षी वारी रद्द करण्यात आली. यामुळे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 12 आणि 13 जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले होते. मात्र, त्या मूळ मंदिरांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, दोन्ही संतांच्या पादुका या पंढरपूरकडे एसटीने जाणार की, हेलिकॉप्टरने जाणार याविषयी कोणताही निर्णय झालेला नव्हता. अखेर यावर निर्णय झाला आहे. लालपरीने दोन्ही संतांच्या पादुका पंढरपुरात रवाना होणार आहेत.