मुंबई-कारवाया करणे, तपास करणे हे तपास यंत्रणांचा अधिकार असून याप्रकरणी आता अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु कुठल्या आधारावर ही कारवाई सुरू आहे, याची माहिती नाही.“मागेही काहींनी सूतोवाच केले होते की आता अमक्याचा नंबर, तमक्याचा नंबर. काही जण बोलतात आणि नंतर तशा पद्धतीने घडतं. यात असा यंत्रणांकडून कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे तपास करण्यासाठी कुणाची ना नाही. तपासाचा अधिकार नियमाने त्यांना दिला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा सगळ्यांची असते,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग राज्य सरकारच्या हातात आहे. सीआयडी राज्य सरकारच्या हातात आहे. त्याच्याकडे काही तक्रारी आल्या तर राज्य सरकारची यंत्रणा कारवाई करू शकते, त्याप्रकारे केंद्राचीदेखील यंत्रणा कारवाई करू शकते. तो अधिकार कायद्याने त्यांना दिलेला आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये याची माफक अपेक्षा सर्वांची आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर आज ईडीने छापेमारी केली. त्याप्रकरणी अजित पवार बोलत होते.
अनिल परब यांच्यावर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे याची माहिती मला नाही. मी आज काहीतरी बोलायचं आणि तिकडे दुसरंच काहीतरी निघायचे. मी माहिती घेतल्याशिवाय या विषयी काही सांगणार नाही. केंद्राच्या यंत्रणांना, राज्यांच्या यंत्रणांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत. मात्र, केंद्राने आणि राज्याने कोणाच्याही बाबतीत दुरुपयोग करू नये, असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांवरदेखील अशा प्रकारच्या कारवाया झाल्या होत्या. आता शिवसेनेत कारवाई झाली याचा अधिकार यंत्रणांना आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये हीच सर्वांची माफक अपेक्षा आहे.