मुंबई. कोरोनाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांवर 3 जून रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्वच किनारपट्टीलगत भागांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्टयावरून भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिला. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, येत्या 12 तासांत वेगवान वारे वाहतील. त्याचेच चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे, मुंबई आणि सभोवतालच्या भागात अलर्ट जारी करण्यात आला. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे दोन पथक पालघर, तीन मुंबईत, एक ठाणे, दोन रायगड आणि एक रत्नागिरी येथे तैनात करण्यात आले आहेत. ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. रेल्वेची वाहतूक ही उद्या असणाऱ्या वाऱ्याचा वेग तसेच त्या अनुषंगाने इतर सूचनांवर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळाने होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसेच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे नऊ गट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्री.अभंग,निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मच्छिमारांना समुद्रातून परतण्याचे निर्देश हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा दबाव ताशी 11 किमीच्या वेगाने पूर्व आणि मध्य अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकत आहे. मंगळवारी सकाळी साडे पाच वाजल्यापासून त्यात वेग आला आहे. सध्या पणजीपासून 280 किमी दूर पश्चिम-दक्षिण, मुंबईपासून 490 किमी दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि सुरत येथून 710 किमीवर दक्षिण-दक्षिणी पश्चिम येथे केंद्र आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, या चक्रीवादळामुळे समुद्रात 2 मीटर उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि रायगडच्या खालच्या भागांवर दिसून येईल. त्यामुळेच मच्छिमारांना सागरातून परत येण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोबतच, किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना दूर पाठवले जात आहे. अमित शहांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ काँफ्रंसिंगच्या माध्यमातून बातचीत केली. यामध्ये राज्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एनडीआरएफचे महासंचालक एसएन प्रधान यांनी सांगितले, चक्रीवादळ निसर्गमुळे ताशी 90-100 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे, महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर असलेल्या लोकांना दूर नेण्याचे काम सुरू आहे.