शासनाकडे दर कमी करण्याची क्रेडाई महाराष्ट्ची मागणी
पुणे :-भारतातील सर्व सिमेंट कंपन्यांनी सिमेंटची किंमत प्रती बॅगमागे ३० टक्क्यांनी वाढविल्याने सर्वसामन्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही कुठल्याही प्रकारचे बांधकाम करणे शक्य होणार नाही तसेच यामुळे बांधकाम खर्चात देखील वाढ होणार असून विकसकांना आणि पर्यायाने ग्राहकांना देखील याचा फटका बसणार आहे.त्यामुळे शासनाने यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
क्रेडाई महाराष्ट्राने असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे तसेच लवकरच हे निवेदन प्रत्येक शहरातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे निवेदन याआधीच देण्यात आले आहे. या अवाजवी दरवाढीमुळे २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकणार नाही.बांधकाम व्यवसाय सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. तसेच यावर अवलंबून असणाऱ्या इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करणाऱ्या व्यवसायांवर देखील या भाव वाढीचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या दर वाढीवर पुनर्विचार करून सरकारने सिमेंट कंपन्यांना दर वाढ कमी करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात सांगितले आहे.