नवी दिल्ली – अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आर्थिक संकटावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. मोदी सरकारने सूडाचे राजकारण सोडून देशाला आर्थिक संकटातून बाहेर कसे काढता येईल यावर लक्ष द्यावे असे आवाहन सिंग यांनी रविवारी केले आहे. भारतात ओढावलेले आर्थिक संकट, 5 टक्क्यांवर आलेला जीडीपी या सर्वच गोष्टींसाठी मोदी सरकारचे वाइट व्यवस्थापन जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.
मनमोहन सिंग म्हणाले, गेल्या त्रैमासिकात आपला विकास दर 5% झाला. यावरून अर्थव्यवस्था मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. भारतात झपाट्याने विकास करण्याची क्षमता आहे. आपला देश सातत्याने अर्थव्यवस्थेच्या स्लोडाउनचा धोका पत्करू शकत नाही. यासाठी मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी सूडाचे राजकारण सोडावे आणि देशाला या संकटातून बाहेर कसे काढता येईल या दिशेने पावले उचलावी. भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहून मोदी सरकारचे व्यवस्थापन प्रत्येक स्तरावर कुचकामी ठरल्याचे दिसून येते. यासाठी नोटाबंदी आणि जीएसटी अशा स्वरुपाचे निर्णय देखील जबाबदार आहेत. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जे नुकसान झाले, त्यातून देश अजुनही सावरलेला नाही.