मुंबई, दि. ३० एप्रिल २०२१
कोरोनाच्या निराशेच्या वातावरणात सकारात्मकता निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाने राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने यात भाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतीक सेलच्या अध्यक्षा विद्या कदम यांनी केले आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना विद्या कदम म्हणाल्या की, संगीत आणि काव्य हे मनोरंजनासोबतच सकारात्मकता निर्माण करण्याचे उत्तम साधन आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून मदत कार्य सुरु आहे, या माध्यमातून रूग्णांना बेड ऑक्सिजन औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे. त्यासोबतच निराशेच्या वातावरणात सकारात्मकता आणि आनंद निर्माण करण्यासाठी सांस्कृतीक विभागाने काव्यवाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी स्वरचित कवितेचे सादरीकरण केलेला व्हिडिओ व त्या कवितेची लिखित प्रत tbcentertainment20@gmail.com यावर ९ मे पर्यंत email पाठवावा. कवितेचा व्हिडिओ २ ते ४ मिनिटाचाच असावा. स्पर्धेतील तीन विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतील. प्रथम पुरस्कार १००१ रुपये, द्वितीय ७०१ रुपये, तृतीय ५०१ व उत्तेजनार्थ २०१ रुपयांची तीन बक्षिसे देण्यात येतील तसेच सर्व सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रवेश विनामुल्य आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी ९८२१८१२३३८, ९६१९५९३३७०, ९७५७०५५९६३ या नंबरवर संपर्क साधावा.