नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2019-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
“अरुण जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती.
अतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता.
आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटली जी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला.
भारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.अरुण जेटली जी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल ”, असे पंतप्रधान म्हणाले.
-उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. उपराष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात, “अरुण जेटली हे माझे दीर्घकाळापासून स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे देशाची तसेच माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि असामान्य व्यक्तीमत्व होते. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आले होते. ऐतिहासिक जीएसटी विधेयकावर राजकीय एकमत घडवून आणण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. ते अतिशय उत्कृष्टपणे संवाद साधणारे आणि अवघड बाबी सोप्या करुन समजावणारे व्यक्ती होते”.
अमित शाह –
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “मी अरूण जेटली यांच्या अकाली निधनामुळे अतिशय दुःखी आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नूकसान आहे. मी केवळ संघटनेचा ज्येष्ठ नेता नाही तर परिवारातील सदस्याला मुकलो आहे. त्यांचे मार्गदर्शन मला कैक वर्षांपासून मिळत होते. त्यांच्या निधनामुळे देशाचे राजकारण आणि भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, जी लवकर भरुन येणारी नाही”.गृहमंत्री म्हणाले “ आपला अनूभव आणि अनोख्या क्षमतेसह अरुण जी यांनी पक्ष आणि सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. उत्तम वक्ते आणि समर्पित कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांनी देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद अशा महत्वपूर्ण पदांची शोभा वाढवली”.
अमित शाह यांनी म्हटले की, “अरूण जी यांनी रालोआ सरकारच्या 2014-2019 या कार्यकाळात पंतप्रधानांचे गरीबांचे कल्याण हे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यास आणि जगातील वेगाने विकसित होणारी देशाची अर्थव्यवस्था निर्माण करुन अर्थमंत्रीपदाचा ठसा उमटवला आहे. ते लोकाभिमुख नेते होते आणि नेहमी सर्वसामान्यांचा विचार करत. त्यांचा प्रत्येक निर्णय- मग तो काळ्या पैशावर कारवाई करण्याचा असो, जीएसटी- एक देश-एक कर, हे स्वप्न साकार करण्याचा, नोटाबंदी असो, यातून हे दिसून येते. देश सदैव त्यांचे अतिशय सरळ आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून स्मरण करेल”.
श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या जेटलीजींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती. महिला आरक्षण, जनलोकपाल विधेयक अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचा आग्रही पुढाकार मूल्यांशी बांधिलकी दर्शवणारा होता. प्रकृती प्रतिकूल असतानाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करतानाच जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले आम्ही त्यांना पाहिले आहे. तसेच प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये ते उपस्थित राहत. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधि व न्याय विभागाचे मंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना त्यांनी नेहमी पाठिंबा दिला. अटलजी, पर्रिकरजी, सुषमाजी यांच्या पाठोपाठ जेटलीजींच्या निधनाने संसदीय राजकारणातील अतिशय अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून माझीही वैयक्तिक हानी झाली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे-
विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व असे गुण असेलेले देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक झंझवाती नेतृत्व गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अभ्यासपूर्ण युक्तिवादाने भल्याभल्यांना गारद करण्याची शक्ती अरुण जेटली यांच्याकडे होती. उत्कृष्ट वकिल म्हणून ख्याती मिळविणाऱ्या श्री. जेटली यांनी विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. देश उभारणीसाठी योगदान देणाऱ्या श्री. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.
मंगल प्रभात लोढा-
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटलीजी हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांचे सहयोगी होते, अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे हे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. देशाचे महान नेते अरुण जेटली यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, एक प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्ववाननेता गमावला.” ते म्हणाले की, “जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे कारण ते माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.” लोढा म्हणाले की, “जेटली यांनी भारताला उच्च स्थानावर पोहचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे सांगत लोढा यांनी शोक व्यक्त करत जेटलीजी यांना श्रद्धांजली वाहिली.
खासदार गिरीश बापट –
पुणे-माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकार मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. राजकारणासह साहित्य, अर्थकारण, वकीली अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. मितभाषी आणि कार्यतत्पर अशी त्यांची ख्याती होती. सुषमाजी यांच्या जाण्यानंतर जो मोठा धक्का आम्हाला व पक्षाला बसला होता त्यातून आम्ही सावरलो नव्हतो. तोच हा मोठा आघात सर्वाच्या मनावर झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.