मुंबई: ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’, असा धीर देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच राहण्याची कळकळीची विनंती पुन्हा एकदा केली आहे. राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/282337206085272/
करोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज राज्याला संबोधित करताना काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या.
करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून ‘हे करोना ते करोना’ असे मी सारखे सारखे म्हणणार नाही. केवळ स्थितीचं भान तुम्ही राखावं इतकीच माझी अपेक्षा आहे. शहरात जीवनावश्यक वस्तूंची ने आण थांबता नये. शेतकऱ्याला शेतात जाऊ दिलं पाहिजे, असे मी सांगितलेले आहे. अन्नधान्याची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही. मात्र हा माल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचे वाहनावर असावे, कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र असावे, इतकीच खबरदारी घ्यायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सरकारने जनतेचे जगणे थांबवलेले नाही तर अधिक जगण्यासाठी थोडीशी शैली बदलावी लागली आहे, असे नमूद करताना धान्य, दूध, औषधे आणण्यासाठी तुम्ही निश्चितच घराबाहेर पजा पण नुसती टेहळणी करण्यासाठी आणि फेरफटका मारायला बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तुम्ही रास्त कारणासाठी घराबाहेर पडला असाल आणि तुम्हाला कुणी अटकाव करत असेल तर पोलिसांना शंभर नंबरवर कळवा. पोलीस तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.मुंबईत धडक कारवाई करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा जप्त केला. या कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पोलिसांकडून अशीच कामगिरी अपेक्षित असून संकटाचा कुणी संधी म्हणून उपयोग करू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले.
साठेबाजी केल्यास कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. अन्नधान्य साठा व वितरण व्यवस्थेचा मी आजच आढावा घेतला. आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. अजिबात काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सर्व बाजूंनी या संकटावर मात करण्यासाठी हात पुढे येत आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. आपण सगळे एकजुटीने या संकटाला सामोरे जावूया व त्यावर मात करूया, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने रक्तदान शिबीर सुरू केले आहे. त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.