दिल्ली – दिल्लीत महिलांना सार्वजनिक वाहनांमध्ये मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बहुचर्चित निर्णयाची सोमवारी अधिकृत घोषणा केली. त्यानुसार, दिल्लीतील महिलांना आता मेट्रो किंवा डीटीसीच्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागणार नाही. दिल्ली सरकारने ही सुविधा सर्वच महिलांसाठी लागू केली आहे. यात कुठल्याही अटी-शर्तींचा समावेश करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे, तर राज्यात नवीन बस आणल्या जाणार असून त्या सर्वांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास सुविधा देण्यात येणार आहेत असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या मंजुरीची गरज नाही -केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्यात 25 ते 30 नवीन बस येणार आहेत. पुढील 12 महिन्यांत दिल्लीत डीटीसी बसची संख्या वाढून 3 हजार केली जाणार आहे. सर्वच बसमध्ये अत्याधुनिक कॅमेरे लावले जातील. महिलांना मोफत प्रवासाची ही योजना येत्या 2-3 महिन्यांत पूर्णपणे लागू केली जाईल. मेट्रो विभागाला याबाबत एका आठवड्याच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या सुविधेची सुरुवात करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगीची गरज नाही. कारण, आम्ही उर्वरीत लोकांसाठी भाडेवाढ करत नाही. आम्ही सबसिडी देत आहोत. या संपूर्ण योजनेसाठी जवळपास 700 ते 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
सक्षम महिलांना तिकीट खरेदी करण्याचे आवाहन
आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी महिलांना मोफत प्रवासाची घोषणा करताना आणखी एक आवाहन केले. त्यानुसार, मोफत प्रवास योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा अटी-शर्ती नाहीत. सर्वच महिलांना ही योजना मोफत केली जात आहे. तरीही ज्या महिला तिकीट खरेदी करू शकतात, ज्या महिला सक्षम आहेत त्यांनी तिकीट खरेदी करावे. त्यांनी मोफत सुविधेचा त्याग करावा. असे केल्यास तिकीट खरेदी करू शकत नसणाऱ्या महिलांनी जास्तीत-जास्त लाभ होईल आणि सरकारला देखील मदत मिळेल असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.