९५ हजार १२७ थकबाकीदार ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून अंधारातच
पुणे, दि. २४ सप्टेंबर २०२१ : थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पुणे परिमंडलातील ९५ हजार १२७ थकबाकीदार ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून शुकवार (दि. २४) पर्यंत अंधारातच आहेत. यामध्ये सर्वाधिक ७६ हजार १३ घरगुती ग्राहकांचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्याबाहेर गेलेल्या व तेथूनच ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे नोकरी करणाऱ्या ग्राहकांमुळे, भाडेकरू नसल्याने बंद घर किंवा इतर कारणांमुळे वीजवापर नसल्याने अनेक घरगुती ग्राहकांनी थकबाकी भरली नसल्याचे महावितरणच्या पडताळणीमध्ये दिसून येत आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर घरात कोणी राहत नाही किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वीजवापर नसला तरी बिलांची थकबाकी ठेऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ग्राहकांनी कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईनद्वारे थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यास वीजपुरवठा सुरु करण्यात येईल. मात्र कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सहा महिन्यांमध्ये व्याज, दंड आणि संपूर्ण थकबाकी न भरल्यास नंतर नवीन वीजजोडणी घ्यावी लागणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजवापर नसल्यास किंवा घर बंद असले सध्याची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे
महावितरणकडून सध्या शून्य ते ३० युनिट वीजवापर होणाऱ्या वीजजोडण्यांची तपासणी वेगाने सुरु आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांच्या पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसा व सायंकाळनंतर विशेष तपासणी सुरु आहे. या दोन्ही मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही आजूबाजूच्या ठिकाणाहून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर आढळल्यास केल्यास नियमाप्रमाणे कलम १२६, १३५ किंवा १३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच पुण्याबाहेरून ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घर बंद असणे, भाडेकरू नसल्याने घर बंद किंवा इतर कारणांमुळे वीजवापर नसल्याने थकबाकी भरलेली नसल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत घरगुती वर्गवारीमध्ये (कंसात थकबाकी) पुणे शहरात ३५ हजार ८५३ (३१.५७ कोटी), पिंपरी चिंचवड शहरात १३ हजार ३०८ (१४.४२ कोटी) तसेच हवेली ग्रामीणसह मुळशी, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, खेड व मावळ तालुक्यामधील २६ हजार ८५२ ग्राहकांचा (२४.९४ कोटी) वीजपुरवठा खंडित आहे. या घरगुती ग्राहकांप्रमाणेच पुणे परिमंडलातील (कंसात थकबाकी) वाणिज्यिक- १६ हजार ७१२ (३१.९६ कोटी), औद्योगिक- १०६१ (६.२१ कोटी), पथदिवे- १४९ (३.४७ कोटी), पाणीपुरवठा योजना- ५२ (२.६३ कोटी) आणि इतर- ११४० (३.७८ कोटी) ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकीमुळे खंडित आहे. घरगुतीसह या सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत वीजबिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा सुरु करण्यात येईल असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.