मुंबई-प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या सरकारी कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मिसेस मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. रश्मी ठाकरेंनी झेंड्यासंदर्भातील आचारसंहितेचा भंग केला आणि झेंड्याला सलाम केला नाही, असा मुद्दा अॅडव्हकेट जयश्री पाटील यांनी उपस्थित करत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे काही फोटोज हे सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंवरुन अॅड जयश्री पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, ‘मी एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येकांना रक्त सांडांवे लागले. या तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले प्राण गमावावे लागेल आहेत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्यामुळेच जर सन्मान करत नसतील, राष्ट्रध्वजाला सलाम करायला त्यांना लाज वाटत असेल तर हा मोठा देशद्रोह आहे. आचारसंहिते प्रमाणे आपण राष्ट्रध्वजाला सलाम करुन त्याला सन्मान देत असतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी झेंड्याला सलाम केलेला नाही. त्यांनी केलेल्या या कृत्याचीचौकशी करायला हवी’ अशी तक्रार त्यांनी दाखल केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेंची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारी उभ्या असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी तिरंग्याला सलाम केला असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. तर रश्मी ठाकरे केवळ स्तब्ध उभ्या असल्याचा हा फोटो आहे.खुद्द सीएमओ महाराष्ट्र या नावाने देखील असलेल्या सोशल मीडियातील खात्यावर हा फोटो शेअर केलेला दिसत आहे .