श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) – 22 जुलै रोजी आंध्र प्रदेेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केलेले चांद्रयान आज सकाळी 9.02 वाजता चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. यानाला चंद्राच्या कक्षेत पूर्णपणे स्थापित होण्यासाठी अर्ध्यातासाचा वेळ लागला. आजपासून 18 दिवस चंद्राची प्रदक्षिणा घालणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी यान चंद्रावर उतरेल.
दरम्यान ‘दिव्य मराठी’ चमूने श्रीहरिकोटातील अंतराळ केंद्राला भेट देत तेथील चांद्रयान मोहिमेसंदर्भात माहिती जाणून घेतली. चांद्रयानापुढील समस्या अद्यापही संपलेल्या नाहीत. पृथ्वीसारखे चंद्रावर वातावरण नसल्याने यानाला उतरताना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता येथील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चांद्रयानातील इंधनाची गळती रोखण्यास उशीर झाला असता तर मोहीम किमान सहा महिने पुढे ढकलावी लागली असती, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
चांद्रयान 2 ही इस्रोची मोहीम 6 महिने किंवा वर्षभरसुद्धा पुढे ढकलली जाऊ शकली असती. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा करत ते सात दिवस शास्त्रज्ञांनी मेहनत घेतली आणि अवघड गोष्ट शक्य करून दाखवली. सात दिवसांत हे काम झाले नसते तर पुन्हा चंद्र आणि पृथ्वी यांची ही स्थिती येण्यासाठी किमान 6 महिने वाट पाहावी लागली असती, अशी माहिती सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक ए. राजार्जन यांनी दिली.
दहा वर्षांपासून सुरू होते काम
2008 मध्ये चांद्रयान 1 ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर काही दिवसांतच चांद्रयान 2 ची घोषणा करण्यात आली. मागील 10 वर्षांपासून या मोहिमेबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू होता. त्यानंतरच चंद्र आणि पृथ्वीची स्थिती, त्या वेळची भौगोलिक परिस्थिती, वातावरण याचा अभ्यास करून 15 जुलै ही तारीख ठरवण्यात आली होती. यानाने अवकाशात झेप घेतल्यानंतर त्याला चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागतात. पुढे 14 दिवस पृथ्वीवरून पाठवण्यात आलेले रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील. हे 14 दिवस म्हणजे चंद्राचा एक दिवस. या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधार असतो व हे लक्षात घेऊन मोहिमेची तारीख ठरवली होती.