अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठे वादंग उठले आहे. तिच्यावर चौफेर बाजुने टीका होऊ लागली आहे. या वादातच आता तिच्या मुंबईस्थित ऑफिसवर महानगर पालिकेच्या काही अधिका-यांनी छापा टाकल्याचे वृत्त आहे. स्वत: कंगनाने त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करुन ही माहिती सार्वजनिक केली आहे. कंगनाने ही सुडाची कारवाई असल्याचे म्हटले आहे.
कंगनाने ट्विटरवर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा व्हिडिओ शेअर करत एकामागून एक तीन ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, बीएमसीची परवानगी आहे त्यानुसार माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदेशीर नाही, बीएमसीने नोटीस देऊन बेकायदेशीर बांधकाम दर्शविणारे स्ट्रक्चर प्लान पाठवायला हवे, आज त्यांनी माझ्या कार्यालयावर छापा टाकला आणि उद्या ते कोणतीही नोटिस न देता पूर्ण स्ट्रक्चर तोडतील.’
- माझे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे : कंगना
कंगना पुढे म्हणाली, ‘हे मुंबईतील मणिकर्णिका फिल्म्सचे ऑफिस आहे, मी पंधरा वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत, चित्रपट निर्माता व्हावे, मुंबईत स्वतःचे ऑफिस असावे, हे स्वप्न मी पाहिले होते. पण आता मला हे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. आज अचानक तेथे बीएमसीचे काही लोक आले आहेत’, असे कंगनाने सांगितले.
- परिणाम भोगण्याची धमकी दिली
तिने लिहिले, ”बीएमसीचे काही लोक जबरदस्तीने कार्यालयात शिरले आणि मोजमाप केले. त्यांनी शेजार्यांनाही त्रास दिला. जेव्हा त्यांनी बीएमसीच्या अधिका-यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले, त्या ज्या मॅडम आहेत, त्यांच्या अशा वागण्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागेल. उद्या ऑफिस तोडले जाऊ शकते, असे त्यांनी मला सांगितले आहे.”
कंगना भाजपचा पोपट – वडेट्टीवार
कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून मिळणाऱ्या धमक्या पाहता केंद्र सरकारने तिला वाय प्लस सुरक्षा दिली. याबद्दल तिने गृहमंत्री अमित शहांचे आभार सुद्धा मानले. पण, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मते, कंगना तर भाजपची पोपट आहे. तिला वाय सुरक्षा नको तर चक्क झेड प्लस सुरक्षाच द्या. कंगनासारखे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात असेही ते पुढे म्हणाले.