जालना -13 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याचे रावसाहेब दानवेंनी वक्तव्य केले. जालना येथे विकास महामंडळांवर नव नियुक्त झालेल्यांचा समस्त ओबीसी समाजाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच ‘पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून पार पडलेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे उपस्थित होते. राजकारणात मराठा समाजाला देखील ओबीसीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून विकास महामंडळांवर नवनियुक्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. ओबीसी समाजाने आमच्याकडे शत्रू म्हणून बघू नये आम्ही तुमचे मित्र आहोत. पुढील काळात आम्हालाही ओबीसीचा दर्जा द्या अशी मागणी करणार असल्याचे वक्तव्य दानवेंनी केले. सरपंचापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून झाली. आता कसलीही अपेक्षा राहिली नाही. पण मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार असल्याचे म्हणत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले. दरम्यान 13 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.