मुंबई, दि. ४ मार्च – कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आलेली असतानाच रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, पुढील पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असून रक्तदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं, असं कळकळीचं आवाहन विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीमार्फत भांडुप येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी दरेकर बोलत होते.
सध्या महाराष्ट्रात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून त्यावर मात करण्यासाठी रक्तदानाची नितांत गरज आहे. हे फार मोठं संकट समोर येऊन ठेपलं असून कोरोना संकट काळात रक्तदान शिबिरात युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, हे काम समाजाला दिशा देणारं आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यामुळे नियमित रक्तदानावर त्याचा परिणाम झाला आहे, परिणामी राज्यातील रक्ताचा साठा कमी होत आहे. एकीकडे करोनाचे संकट असताना आता हे नवे आव्हान राज्य सरकारपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे भाजप सहकार आघाडीने योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊन रक्ताचा तुटवडा असताना , गरज ओळखून मुंबईत रक्तदान शिबिराची मोहीम राबवली आहे. आतापर्यंत ५० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या असून प्रत्येक शिबिरातून ५० -१०० बाटल्यांचं नियोजन झालं तर रुग्णालयांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था कोलमडली असून सरकार आरोग्य यंत्रणा वाढवली असल्याचे सांगत असले तरी कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटरची कमतरता आजही भासत आहे, वेळेत ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटर मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे. त्यामुळे वस्तुस्थितीला सामोरं जात व्यवस्था सशक्त करण्याची आवश्यकता आहे. तसेच वाढत्या रुग्णांची परिस्थिति बघता १० हजार रुग्णांना पुरेल एव्हढी सुद्धा आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे येणाऱ्या भीषण वास्तवाला सामोरं जाण्याची तयारी सरकारने करावी, अशी सूचनाही दरेकर यांनी यावेळी सरकारला केली आहे.
या रक्तदान शिबिरास माजी आमदार श्याम सावंत, भाजप सहकार आघाडी अध्यक्ष सुनिल बांबुळकर, मुंबई उपाध्यक्ष विनायक कामत, जिल्हाध्यक्ष अशोक राय, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष हरीश हिंगे, ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री ईश्वर साकडे, रामा जाधव, बाबुलनाथ दुवे, विशाल चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.