नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलाचे काम तातडीने पूर्ण करा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली नुकसानग्रस्त दुकानांची आणि बोरिवलीतील मिठी नदीची पाहणी
मुंबई, दि. १९ जुलै – शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे बोरिवलीतील अनेक भागांत कंबरेभर पाणी साचले होते. बोरिवली पूर्व येथील शांतिवन परिसरातील व्यापारी व घरांना याचा फटका बसला.
बोरिवलीतील या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दुकानांच्या नुकसानीची पाहणी केली. तेथील रहिवाशांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बोरिवलीतून जाणाऱ्या मिठी नदीची विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली.व्यापाऱ्यांचे नुकसान भरून देण्यासाठी त्यांच्या दुकानाचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दरेकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे बोरिवलीतील मिठी नदीची पाण्याची पातळी वाढली असून सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. नदीकाठी वसलेले शांतिवन परिसर, श्रीकृष्णनगर दरवर्षी जलमय होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दरवर्षी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असते. आजही नदीकाठी असलेल्या अनेक झोपडपट्ट्या, सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी साचले असून नांगरिकांसहित व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच लॉकडाउनमुळे व्यापारी निराश झाला आहे. त्यात आता मुसळधार पावसामुळे असे नुकसान झाल्यामुळे व्यापारी खचला जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलाचे काम लवकरात लवकर करा
नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलावरून दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मनपा अधिकाऱ्यांना खडसावले. पुलाचे काम लवकर लवकर पूर्ण करा, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त वेलारासूंसोबत बैठक घेणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे भाजप अध्यक्ष दिलीप उपाध्याय, विक्रम चौघुले, हेमचंद्र नार्वेकर, संजय शिरवडकर, वॉर्ड अध्यक्ष संजय मोरे, लक्ष्मण कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.