एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड :१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
मुंबई-मनसे मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. तसंच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असंही सांगितलं आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली.
सध्या पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. बुधवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे.