मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत अशा शब्दांत आमदार आणि प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी कौतुक केलं आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. उद्धव ठाकरे सरकारने अत्यंत सहजपणे बहुमत सिद्ध केलं आहे. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भाजपाने मात्र हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
बहुमत सिद्ध झाल्यानंतर सर्व आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो. उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळालं आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो”.