नवी दिल्ली : – मोटार वाहन अधिनियम कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. याविषयी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, 1 सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार असून, रस्त्यावर गाडी चालवताना तुम्ही नियम तोडल्यास यापुढे मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागणार आहे.
याबाबत गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांत याला मंजुरी मिळणार असून 1 सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. राष्ट्रपतींचे या विधेयकावर हस्ताक्षर झाले असून हा कायदा लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.
अशी असेल दंडाची रक्कम
1) वेगाने गाडी चालवल्यास
याआधी वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला 500 रुपये दंड किंवा 3 महिन्यांच्या शिक्षेची तरतूद होती. मात्र नवीन सुधारित कायद्यानुसार तुम्ही हे नियम मोडल्यास 5 हजार रुपये दंड तर 3 महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 10 हजार रुपये दंड आणि 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
2) ओव्हरलोडिंग
याआधी ओव्हरलोडिंगचा नियम मोडल्यास 2 हजार रुपये दंड भरावा लागत असे. त्यामुळे आता यापुढे नियम मोडल्यास 10 हजार रुपये दंड तसेच 6 महिन्यांची शिक्षा देखील होणार आहे.
3) दारू पिऊन वाहन चालवणे
याआधी यासाठी 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागत असे. मात्र आता यापुढे 10 हजार रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांची शिक्षा देखील होणार आहे.
4) वाहतूक नियम आणि फोनवर बोलताना पकडल्यास
यासाठी आधी 1 हजार रुपये दंड तसेच 6 महिन्याची शिक्षा होत असे मात्र आता यापुढे 5 हजार रुपये दंड आणि 1 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
अंतिम मंजुरीसाठी विधेयक कायदा मंत्रालयाकडे
मोटार वाहन अधिनियम विधेयकामध्ये बदल केल्यानंतर हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले असून ते सध्या मंजुरीसाठी कायदे मंत्रालयाकडे पाठवले असून त्याच्या मंजुरीची वाट पहिली जात आहे.