डॉ. नीलम गोऱ्हे, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी, आ. सचिन अहिर, आ. मनीषा कायंदे, संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.
मुंबई-आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले, मारहाणीच्या घटनेबाबत शिवसेनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आज यावर नियंत्रण ठेवून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांवर कार्यवाही करावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.कात्रज येथे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्यासंदर्भात ज्यांनी हल्ला केला त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्या ऐवजी पोलिसांनी मात्र आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करणाऱ्यांवर या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला ,जे हल्ला करणाऱ्यात नव्हते हल्ला झाला तिथे नव्हते ,अशा पद्धतीने शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये असे या नेत्यांनी महासंचाकांना सांगितले यावर या सर्व घटनांवर विशेषत: पुण्यातील घटनेवर प्राधान्याने योग्य ती कार्यवाही करण्याचे आणि त्याचा अहवाल तयार करण्याचे पोलिस महासंचालकांनी मान्य केल्याचे वृत्त आहे.
या शिवाय पुणे जिल्ह्यात महिलांवर होणारे अन्याय या विषयी महासंचाकांचे लक्ष वेधण्यात आले. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या सुधारणा करून परिवहन विभागाचे परिपत्रक दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले.सांगली, माथेरान, डोंबिवली,नाशिक, वैजापूर येथील काही घटनांबाबत देखील महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस मागील काही महिन्यांत गुजरात, आसाम, गोवा राज्यात जास्त दिवस गेले होते तेंव्हा त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला. याला खा.विनायक राऊत यांनी पाठिंबा दिला. यावर माहिती घेण्यात येईल असे महासंचालक यावेळी म्हणाले. यावेळी सर्वच शिष्टमंडळ सदस्यांनी या सर्व घटनांवर दखल घेण्याची मागणी केली आहे.