नागपूर- केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ,नागपूर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी समारंभात गडकरी यांनी सध्याच्या राजकारणावर परखड भाष्य केले.त्यांनी थेट राजकारण सोडण्याची भाषा केली आहे. ‘पूर्वी राजकारण म्हणजे समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण व सत्ताकारण होते. मात्र, आता राजकारण हे 100 टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण केव्हा सोडू अन् केव्हा नको असे वाटत आहे’, असे ते म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे ,अरुण गुजराथी असे विविध आजी माजी नेते ,सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, भारतात महात्मा गांधींपासून राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होते. लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकारण महत्त्वाचे माध्यम होते. मात्र, आता राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आता राजकारण केवळ सत्ता मिळवण्यासाठी केले जाते. त्यामुळे असे हे राजकारण कधी सोडू, असे वाटतेय.नितीन गडकरी म्हणाले, राजकारणाच्या माध्यमातून शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती यात आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. समाजाला दिशा देण्याचे काम राजकारणाच्या माध्यमातून करता येते. आपली संस्कृतीदेखील सर्व विश्वाचे कल्याण होवो, या विचारांची आहे. केवळ माझे कल्याण व्हावे, असे आपल्याला कधीही सांगितले जात नाही. खरे तर या विचारानुरुपच जगले पाहिजे. मात्र, आता राजकारणात तसे होत नाही. सध्या राजकारणापेक्षा अनेक गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत.
जॉर्ज फर्नांडिसकडून शिकवण
मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. माझ्या स्वागताला आणि निरोप द्यायला कधी सरकारी अधिकारी दिसणार नाही की कार्यकर्ता. कोणी पुष्पगुच्छ घेऊन आलाच तर मी त्याला सुनावतोच. कशाकरिता आला आहेस, तुला वेळ भरपूर आहे का, पुन्हा दिसलास तर लक्षात ठेव, अशा शब्दांत मी त्याला खडसावतो. हे मी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून शिकलो.
आमचे फोटो उंदरासारखे
बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांनाही नितीन गडकरी यांनी टोला लगावला. गडकरी म्हणाले, मी आजपर्यंत बॅनर लावला नाही. उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली स्वत:चा मोठा फोटो लावतात. परंतू, जेव्हा विचार करतो तेव्हा राजकारण नेमके कशासाठी करायचे हे लक्षात येते, असे गडकरी म्हणाले.