मुंबई- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चव्हाण यांच्यावर नांदेडमध्येच उपचार सुरु असल्याची माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना कोरोनासोबतची राज्याची लढाई यापुढे अधिक बिकट होणार असून, आता रुग्णांच्या संख्येचा जीवघेणा गुणाकार होईल.
मात्र, घाबरून जाऊ नका, सरकारकडून आरोग्यसेवा निर्माण केली जात आहे, असे सांगताना आता कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्या, असा सल्ला दिला होता.
लॉकडाऊन एकदम उठवणे चुकीचे असून, हळूहळू शिथिल केला जाईल. मात्र, गर्दी झाली तर परत सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुढच्या 15 दिवसांत देशातील संसर्गाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येईल, इतपत सगळे सुरळीत करण्याची आमची इच्छा आहे. मात्र, हे करताना कोरोनाला टाळावे लागणार आहे, असे ठाकरे म्हणाले.
लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला असला, तरी एकदम लॉकडाऊन करण्यासारखेच तो एकदम उठवणेही चुकीचे असल्याने हळूहळू सगळे सुरू केले जाईल. मात्र, गर्दी झाली तर पुन्हा सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. उद्योगधंदे-व्यवसाय सुरू केल्यावर शिस्त पाळली गेली नाही, तर मात्र हे सगळे पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही उद्धव यांनी नमूद केले.