चित्रपट गृहातील मारहाण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्याने याप्रकरणी मुंब्रो पोलिसांकडे तक्रार केली आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली आहे.
खोटे गुन्हे दाखल केले
जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहे, तेही कलम 354चे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.
ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात काल रात्री आव्हाडांविरोधात भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काल मुंब्रा येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यातच ही घटना घडल्याचे भाजप महिला पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.
महिलेचा नेमका आरोप काय?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते काल ठाण्यात दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रथम कळवा पूल व त्यानंतर मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप महिला पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि महिला पदाधिकारी आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. या घटनेबाबत महिला पदाधिकाऱ्याने आरोप केला की, आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलले.
घटनेनंतर भाजप महिला पदाधिकाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनीही तातडीने तक्रारीची दखल घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतापलेल्या जितेंद्र आव्हाडांनी 72 तासांत पोलिसांनी माझ्याविरोधात दोन खोट्या केसेस दाखल केल्या. लोकशाहीची हत्या बघू शकत नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली.
शनिवारीच मिळाला जामीन
हर हर महादेव चित्रपटाला विरोध करण्यासाठी चित्रपटगृहात धुडगूस व प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणातून दिलासा मिळत नाही तोच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिस आता याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.