कोल्हापूर – अनलाॅकमध्ये सर्व उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे. मात्र वारंवार मागणी करूनही कलाकारांना कार्यक्रम करण्यास परवानगी दिली जात नाही. परिणामी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कार्यक्रमांना परवानगी द्या, नाहीतर आमच्या अंगावरून वाहने चालवा असे म्हणत कलाकारांनी शुक्रवारी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला. यावेळी पोलिस व आंदोलकांत झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 30 सप्टेंबरपर्यंत परवानगी न दिल्यास 4 ऑक्टोबरला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.
महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यापूर्वी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आदींसह सर्वांना कार्यक्रमास परवानगी देण्यासाठी निवेदने देण्यात आली आहेत. तसेच एक दिवसाचे ‘ढोल-ताशा वाजवा’ आंदोलनही करण्यात आले होते. तरीही कलाकारांच्या बाबतीत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचा निषेध करत कलाकारांनी महामार्गावर झोपून रास्ता रोको आंदोलन केले.
राज्यभरात हजारो कलाकार आहेत. हे सर्व कलाकार विविध धार्मिक सण उत्सवात कार्यक्रम करून करून तसेच विवाह समारंभात आपली कला सादर करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र असे कार्यक्रम करण्यास राज्य शासनाने अजुनही बंदी घातली असल्याने या कलाकारांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.