मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी चौदा महिने तुरुंगात काढावे लागल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर बुधवारी (दि. २८) बाहेर आले. हायकोर्टानं कोठडी वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळल्यानं त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देशमुखांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी देशमुख यांनी संवाद साधला.
अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”
“उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
“मुंबईतील उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वझेला अटक झाली आहे. तीनवेळा त्याला निलंबित करण्यात आलं आहे. अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.
माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांचा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला यासाठी मी त्यांचं मनःपूर्वक आभार मानतो.
तसेच राष्ट्रवादीचे आमचे सर्वैच्च नेते शरद पवार आणि आमचे वरिष्ठ सहकाऱ्यांनी वेळोवेळी यानिमित्तानं पाठींबा दिला आणि सहकार्य केलं यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद, अस यावेळी देशमुखांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.