मुंबई – राज्यांचे हक्काचे पैसे राज्यांना वेळेवर मिळत नसतील , त्यासाठी वारंवार मागण्या कराव्या लागत असतील तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन जीएसटी बाबत केंद्रावर ,पंतप्रधानांवर दबाव आणून जीएसटी फेल गेली असेल तर प्रसंगी जुनी करप्रणाली सुरु करावी अशी सूचना देत आज शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपावर कडाडून हल्ला चढविला .
कोरोनाचं सावट असल्याने यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा शिवतीर्थावरून न होता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडला. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून न बोलता शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्राला आपल्या दसरा मेळाव्यातून संबोधित केलं. वर्षभर मनात साचलेलं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बोलून दाखवले.
आम्ही बोललो. जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील. केंद्राकडे जून महिन्यापासून आपत्तीग्रस्तांसाठी पैसे मागितले. त्यासाठी एक छदाम आलेला नाही. मागायचे नाहीत का पैसे? मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता? दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत. का पैसे मागायचे नाहीत. लग्न आम्ही केलं. जरूर केलं. पण लग्न करताना बाप तर सोडाच, आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो सुद्धा आहेर घेऊन पळालेला आहे. मोजतो म्हणाला, मोजतोय की काय करतोय देव जाणो,” अशा शब्दात ठाकरे यांनी दानवे यांच्यावर टीकेची तोफ डागली.
मंदिरं खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचलं होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत टोला लगावला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.“हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“आम्हाला हिंदुत्वाबद्दल कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली त्यानंतर देशात जो हल्लकल्लोळ उसळला. तेव्हा कोणाची हिंमत नव्हती सांगायची. आता जे आम्हाला हिंदुत्वावर प्रश्न विचारत आहेत, ते त्यावेळी शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते, काही कल्पना नाही. कदाचित त्या वेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हतं ते आम्हाला विचारताहेत तुमचं हिंदुत्व कुठं गेलं? तुम्ही अचानक सेक्युलर झालात?
“शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरं येतंय काय? मला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवंय. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्याच सांगितली.
हिंदुत्व कसं हवं जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं, हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. सकाळी रा. स्व. संघाचा मेळावा झाला यामध्ये सरसंघचालकांनी भाषण केलं. त्यांना मानणारे आणि त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर डोक असेल तर त्या डोक्यानं तुमच्या सरसंघचालकांच्या वाक्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडून हिंदुत्व समजून घ्यावं, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र डागलं. जीएसटीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरून निशाणा साधला. “दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत,” अशा शब्दात ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे, भाजपा नेते, राज्यपाल यांच्यावर शरसंधान साधलं. ठाकरे म्हणाले, सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या पण थोडं लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे,
उद्धव ठाकरे म्हणाले,”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व मुद्दे :
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत, काही वेळातच शिवसैनिकांना संबोधित करणार
- आपल्या संपूर्ण परिवारासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत
- शिवाजी पार्कवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात जात उद्धव ठाकरे नतमस्तक
- उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, सोबतच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल
- उद्धव ठाकरे सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, ढोलताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत
- शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा पहिल्यांदाच सभागृहात, कोरोनामुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचं संबोधन
- उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचं व्यासपीठावर आगमन
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परंपरेनुसार केलं शस्त्रपूजन
- उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात, मराठीत मातीत काय तेज आहे मराठी मातीची ताकद काय आहे याची प्रचिती दिली नंदेश उमप यांनी करून दिली
- जर हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत – उद्धव ठाकरे
- वर्षभरापासून मुख्यमंत्री झालो,गेल्या सहा महिन्यापासून फेसबुकवरून लाईव्ह बोलत होतो. आज मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन बोलणार आहे.
- ज्या मातीने औरंगजेब गाडला त्या महाराष्ट्राच्या मातीचं तेज अजूनही तसंच आहे.
- हिंदुत्त्वावरून प्रश्न विचरतायत कारण मंदिरं उघडत नाही, हिंदुत्वाबाबत विचारणारे हे कोण ? – उद्धव ठाकरे
- एकमेकांना केवळ टोप्या नका घालू, हिंदुत्वाचा अर्थ सरसंघचालकांकडून समजून घ्या – उद्धव ठाकरे
- तुमच्यासाठी राज्यातील जनता मतं असतील पण माझ्यासाठी ही हाडामाणसाची माणसं आहेत – उद्धव ठाकरे
- जेवढं लक्ष पक्षावर देतायत, तेवढं लक्ष देशातील जनतेकडे द्या – उद्धव ठाकरे
- शिवसेना कायम GST ला विरोध करत होती, GST मुळे राज्याचे पैसे त्यांना मिळत नाहीत.
- GST करपद्धती सदोष आहे, आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळत नसेल तर या करपद्धतीवर चर्चा करायला हवी
- GST करप्रणालीमध्ये त्रुटी असतील तर मोदींनी त्या चुका सुधाराव्या
- माझं टार्गेट भाजप नाही, पण देशाची विल्हेवाट लागत चालली आहे, राजकारण एके राजकारण सुरु आहे
- दानवेंचा बाप भाडोत्री असेल माझा नाही, लग्नाच्या आहेराची पाकिटं पळवून नेणारे तुमचे बाप – उद्धव ठाकरे
- मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे – उद्धव ठाकरे
- महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून महाराष्ट्राची बदनामी, मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलिसांचे काहीही लक्ष नाही असं दाखवलं जातंय
- महाराष्ट्र नशेडयांचं राज्य असल्याचं चित्र रंगवलं जातं – उद्धव ठाकरे
- आमच्या अंगणात तुळशी वृंदावने आहेत, गांजाची नव्हे – उद्धव ठाकरे
- तोंडात शेण आणि गोमूत्र भरून ठाकरेंवर गुळण्या केल्यात, शेण आणि गोमूत्राच्या चुळा आमच्यावर भरल्यात, आता ते शेण गिळा आणि गप्प बसा
- तुमच्याकडे लाठी काठी असेल, आमच्याकडे मनगट आहे. तलवारीने युद्ध जिंकलं जातं पण त्यासाठी मनगट लागतं
- आम्ही महाराष्ट्र हिताचे निर्णय घेतलेत तर फटाके नका वाजवू पण खोटं तरी नका बोलू
- आम्ही एक नया पैसा खर्च न करता कारशेड उभारत आहोत, आम्ही ८०८ एकरांचा जंगल वाचवलं
- सध्याचा काळ कठोर आहे , मात्र केवळ राजकारण झालं तर देशात अराजकता निर्माण होईल
- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या, यापुढे महाराष्ट्रात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही
- केवळ पाडापाडी करण्याचं भाजपाला रस आहे
- सर्व समाजाच्या लोकांना हात जोडून सांगतो, जातीपातींचं राजकारण करणार्यांना बळी पडू नका
- मराठा, धनगर OBC आदिवासी सर्व समाजांना न्याय देणार, महाराष्ट्रात जातीवरून दुफळी माजू देऊ नका