नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज दिल्लीत अधिवेशन पार पडले. त्यात अजित पवारांच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यामुळे अजितदादांचा पारा चढला आणि ते थेट व्यासपीठावरून उतरून निघून गेले. या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे तिथे उपस्थित सर्वचजण अवाक झाले.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना परतण्याची विनंती केली. पण त्यानंतरही ते व्यासपीठावर आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यानी एकच गदारोळ केला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांची समजूत काढण्यासाठी गेल्या. तोपर्यंत शरद पवारांचे समारोपाचे भाषण सुरू झाले. यामुळे अजित पवारांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही.
अजित पवार यांचा स्वभाव तडकाफडकी आहे. याचा अनुभव अनेकदा पक्षातील पदधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही येत असतो. अजित पवार राष्ट्रीय अधिवेशनातून दोनदा बाहेर पडल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले होते.
आजच्या अधिवेशनासाठी देशभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. हे अधिवेशन काही महाराष्ट्रापुरते नव्हते, राष्ट्रीय अधिवेशन असल्याने महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आपले मत मांडले. केरळमधील आणि लक्षद्वीप येथील खासदारांनी भाषण केले. राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे मी भाषणाबद्दल काही बोललो नाही, असे मत अजित पवार यांनी यानंतर व्यक्त केले.