मुंबई (प्रतिनिधी) -कोरोना काळात आर्थिक परिस्थितीमुळे बेजार आणि “अर्थ ” हीन झालेल्या लोककलावंतांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सांस्कृतिक कार्य खात्याने पाच कोटी रुपयांची जनजागृती करणारी योजना आणली खरी,मात्र संबंधित योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याने कोलदांडा दावला आहे.यामुळे अजून काही महिने तरी लोककलावंतांना जनजागृतीचे कार्यक्रम मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.
मार्च २०२० पासून राज्यात कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमुळे लॉकडाऊन लागले, त्यामुळे आजमिती पर्यत राज्यातील सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठी खीळ बसली आहे.यामध्ये सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील लोककलावंतांना बसला.त्यामुळे सरकारने काही तरी आर्थिक मदत करावी म्हणून अनेक जिल्ह्यातील कलावंतांनी आणि त्यांच्या विविध संघटनानी आंदोलनं छेडली होती.
त्यानंतर उशिरा का होईना सरकारला जाग आली. अन कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी आणि लसीकरण मोहीमीची जनजागृती करण्याकरिता सांस्कृतिक कार्य विभागाने ०५ मे/२०२१ रोजी लोकलावंतांना प्रत्येक जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम देण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक कलाकाराला प्रति कार्यक्रमासाठी पाचशे रुपये मानधन देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करणारा “शासन निर्णय” जारी करण्यात आला.
परंतु संबंधित योजनेचा प्रस्ताव आर्थिक मंजुरीसाठी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांभाळत असलेल्या अर्थ खात्याकडे गेला,तेव्हा मात्र या खात्याने अनेक त्रुटी काढून प्रस्ताव पुन्हा सांस्कृतिक कार्य विभागाकडे धाडला. त्यानंतर पुन्हा सांस्कृतिक कार्य खात्याने त्रुटी दूर करून आर्थिक मंजुरीसाठी प्रस्ताव अर्थ खात्याला पाठविला आहे. आज महिना होत आला आहे,तरी अर्थ खातं या गोरगरीब उपेक्षित लोककलावंतांसाठी तयार केलेल्या योजनेला आर्थिक मंजुरी दयायला तयार नाहीत.
.सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी रोज सांस्कृतिक कार्य आणि अर्थ खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून संबंधित योजनेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत आहेत. या योजनेला तातडीने आर्थिक मंजुरी मिळण्यासाठी ते रोज मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.पण मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य खात्याच्या आणि अर्थ खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने, संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीत. त्यामुळे “आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून”अशी अवस्था सांस्कृतिक कार्य संचालनालयाची झाली आहे. अजून आर्थिक तरतूद झालीच नाही,तर लोककलावंतांना कार्यक्रम देणार कुठून..! असे त्यांचे म्हणणे आहे यामुळे .याचा मोठा फटका महाराष्ट्रातील लोककलावंतांना बसला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट संपून तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी अजून सरकारी मदतीची किती दिवस वाट पहायची? असा प्रश्न लोकाकलावंतना पडला आहे.
आता पर्यत सुमारे सहा हजार लोककलावंताची नोंद या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झाली असल्याचे कळते.कार्यक्रम केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारणारे फोन रोज संचालनालयामध्ये खणखणत असतात, यामुळे येथील अधिकारी उत्तर देवून – देवून हैराण झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कधीही कामाचा खोळंबा होत नाही.अशी त्यांची ख्याती आहे. ते कुशल प्रशासक आहेत.त्यांना उपेक्षित समाजाची जाण आहे.त्यांचा आपल्या खात्यावर चांगलाच अंकुश असताना अर्थ खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यामुळे या योजनेला अनर्थ येतोय,असा सवाल सध्या महाराष्ट्रातील लोककलावंत करीत आहेत.