हिंगोली -भारत जोडो यात्रा चोरांबा फाटा येथे पोहचली. त्यावेळी आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले. ते नागरिकांसोबत काहीवेळ चालल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत ते चालले. यावेळी त्यांनी राहुल गांधींशी चर्चाही केली. याचवेळी पन्नास खोके एकदम ओक्के! अशी घोषणाबाजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देत शिंदे गटाला पुन्हा डिवचले.
काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील डोंगरकडा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे आहे. या यात्रेत युवासेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी सहभागी झाले. कालच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. आदित्य यावेळी राहुल गांधी यांच्याशी चालताना आणि चर्चा करतानाही दिसले.
भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत हमाल, मापाडी, पोतराज, आदिवासी, शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
- नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे झाला. गुरुवारी- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.
- भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिम येथून मार्गक्रमण करेल.
- नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.