मुंबई. बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या बातमीतून लोक सावरलेही नव्हते की बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीसुद्धा जगाचा निरोप घेतला. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवर याविषयी माहिती दिली आहे. बिग बी यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘तो गेलाय… ऋषी कपूर गेलाय… मी उद्धवस्त झालोय!’
काल इरफान खान च्या मृत्यू नंतर बॉलीवूड आणि रसिकांना लागोपाठ बसलेला हा मोठा दुसरा धक्का कोरोना संकटाच्या काळातच बसला आहे.
ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.
ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती
2 वर्षांपूर्वी कॅन्सरचे झाले होते निदान
ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू होत्या. तर मुलगा रणबीर त्यांना अनेक वेळा भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता. काही दिवसांपूर्वी ऋषी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “आता मला बरे वाटत आहे. आणि कोणतेही काम करू शकतो. पुन्हा अभिनय कधी सुरू करण्याचा विचार करतोय. पण लोकांना आता माझे काम आवडेल की नाही हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्याचदा रक्त चढवण्यात आले. तेव्हा मी मी नीतूला म्हटले होते की – मला आशा आहे की नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही.”
चाहते न्यूयॉर्कमध्ये भेटीसाठी पोहोचले होते
जेव्हा ऋषी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते, तेव्हा त्यांचे मित्र आणि प्रियजन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तेथे आले होते. यामध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, करण जोहर आणि मलायका अरोरा यांचा समावेश होता. ऋषी शेवटचे मरान हाश्मीसोबत स्क्रीनवर दिसले होते.
फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
ऋषी कपूर यांना फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकदा जेव्हा ते दिल्लीतील एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, ऋषी यांनी स्वतः सांगितले होते की, त्यांना संसर्ग झाला होता. मुंबईत परतल्यानंतर, पुन्हा व्हायरल तापामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तब्येत सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
महिन्याभरापासून सोशल मीडियापासून दूर
सोशल मीडियावर आपल्या लॉजिकल आणि अग्रेसिव्ह कमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांनी 2 एप्रिलनंतर ट्विटर अकाऊंटवर काहीही पोस्ट केले नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार असल्याची घोषणा केली होती. यात दीपिका पदुकोण त्यांच्यासोबत काम करणार होती.
पृथ्वीराज कपूर यांचा नातू आणि राज कपूर यांचा मुलगा
चिंटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईच्या चेंबूर येथे झाला होते. ते राज कपूर यांचा दुसरा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचे नातू होते. त्यांनी आपल्या भावांबरोबर मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि अजमेरमधील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. रणधीर कपूर हा त्यांचा मोठा भाऊ आणि राजीव कपूर हा त्यांचा धाकटा भाऊ आहे. ऋषी आणि नीतू यांना रणबीर कपूर हा मुलगा आणि रिदिमा कपूर ही मुलगी आहे.
ऋषी कपूर यांचा चित्रपट प्रवास
1970 रिषी कपूर यांनी 1970 मध्ये वडील राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ऋषींनी त्यांच्या वडिलांच्या बालपणीची भूमिका वठवली होती. 1973 मध्ये आलेल्या ‘बॉबी’ या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या कारकीर्दीत, त्यांनी 1973-2000 पर्यंत सुमारे 92 चित्रपटांमध्ये रोमँटिक हीरो म्हणून काम केले. सोलो लीड अभिनेता म्हणून त्यांनी 51 चित्रपटांमध्ये काम केले. ऋषी त्यांच्या काळातील चॉकलेट हीरोंपैकी एक होते. त्यांनी बॉलिवूडला अनेक रोमँटिक हिट्स दिले. आपल्या पत्नीसह त्यांनी एकुण 12 चित्रपटांत काम केले. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
ऋषी यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला होता. त्यांनी 1998 मध्ये अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत ‘अब अब लौट चले’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.