केरळच्या करिपूर विमानतळावर मुसळधार पावसात शुक्रवारी रात्री लँडिंग करताना एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरून थेट ३५ फूट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले.यात दोन्ही वैमानिकांसह १७ जणांचा मृत्यू झाला. १७५ प्रवासी-क्रू मेंबर सुरक्षित आहेत. एकूण १२५ जण जखमी झाले आहेत.
रात्री ११ पर्यंत सर्व प्रवासी बाहेर काढले
बचाव पथकांनी रात्री ११ वाजेपर्यंत विमानात अडकलेल्या सर्वांची सुटका केली होती. एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स-३४४ विमान वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून भारतीयांना घेऊन आले होते. त्यात एकूण १९१ जणांत १७४ व्यक्ती, १० नवजात बालके, २ वैमानिक व ५ केबिन क्रू हाेते. हे बाेइंग ७३७ विमान रात्री ७.४१ वाजता लँडिंगच्या प्रयत्नात धावपट्टीवरून घसरून पुढे फरफटत गेले होते.
वैमानिक दीपक साठे होते माजी विंग कमांडर
विमानाचे वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे हे २२ वर्षे वायुदलात फायटर प्लेनचे पायलट होते. त्यांनी मिग-२१ सारखी विमानेही उडवली होती. साठेंनी २००३ मध्ये विंग कमांडर पदावरून मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. साठे हे खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ५८ व्या कोर्सचे सुवर्णपदक विजेते होते. त्यांना स्वोर्ड ऑफ ऑनर सन्मानही मिळालेला होता. त्यांचे मोठे बंधू कारगिल युद्धात शहीद झाले होते. वडील वसंत साठे लष्करात ब्रिगेडिअर होते.
करिपूर विमानतळाची धावपट्टी आहे टेबल टाॅप, पुढे खोल दरी
डोंगराळ भागातील या विमानतळाची धावपट्टी टेबल टाॅप आहे. म्हणजेच एका ठरावीक अंतरानंतर पुढे खोल दरी आहे. धावपट्टीवर पाणी तुंबल्याची माहिती नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी दिली.
– या विमानतळावर २००८ ते २०१७ दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरण्याच्या चार मोठ्या घटना घडलेल्या आहेत. – डोंगर कापून उभारले आहे करिपूर विमानतळ, विमान ३५ फूट दरीत कोसळले -१२४ जखमी, पैकी १५ गंभीर: विमानात १० नवजात बालके, उशिरापर्यंत बचावकार्य – पाऊसही मोठे कारण : लँडिंग करण्याआधी विमानाने आकाशात दोनदा घिरट्या घातल्या