मुंबई–जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी सायंकाळी माझा विनयभंग केला, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. याच आरोपावरुन जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा रशिद गर्दीत समोरासमोर आले तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी त्यांना बाजुला केल्याचे दिसत आहे. यावरुनच रिदा रशिद यांनी आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही घटना घडली.
आव्हाडांनी गर्दीचा फायदा घेतला
तक्रारीत रिदा रशिद यांनी म्हटले आहे की, काल सायंकाळी 4 वाजता मुंब्रा येथे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुलाचा लोकर्पण सोहळा होता. या कार्यक्रमासाठी मीदेखील गेले होते. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीच्या डाव्या बाजुस मी उभे होते. त्याच बाजुने जितेंद्र आव्हाड समोरून आले. मी पुढे थांबली असुनही गर्दीचा फायदा घेवुन माझा विनयभंग करण्याचे उद्देशाने त्यांनी दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही खांदयास धरले. “काय मध्ये उभी आहे चल बाजुला हो ” असे लोंकाना समजु नये म्हणुन बोलुन मला बाजुला ढकलले.
वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाडांनी मला वेगळया उद्देशाने स्पर्श केल्याने माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यावेळी मी तेथुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 1 यांच्याकडे गेले. त्यांनी या बाबीची तक्रार देण्यासाठी सांगितल्याने मी मुंब्रा पेालिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.