कोल्हापूर : राज्यातील कोल्हापूर-सांगली भागात महापूराने थैमान घातले होते. पूर ओसरत असला तरी येथील परिस्थिती सावरण्यास वेळ लागणार आहे. सध्या विविध संस्था, दानशूर व्यक्ती. सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अनेक सिनेसृष्टी आणि टीव्ही कलाकारांनीही खूप मदत केली आणि करत आहेत. नाना पाटेकर शिरोळ पुरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आले होते. येथे नागरिकांना यथोचित भोजन देण्यात आले. दरम्यान तेथील महिलांनी आपले दुःख नानांसमोर व्यक्त करण्यासाठी त्यांना घेराव घातला. नानांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
नाना पाटेकर म्हणाले, ‘आम्ही शिरोळ येथे 500 घरे बांधणार आहोत. त्यानंतर टाकळीवाडीलाही 3000 घरे बांधली जाणार आहेत. तसेच कोल्हापूर सांगलीच्या इतर विभागातही घरे बांधली जाणार आहेत. सरकारसोबत मिळून हे काम मी करणार आहे. यामध्ये कुणाही एकाचे श्रेय नाही आणि त्याने ते घेऊही नये. शासनासोबत राहून नागरिकांना सर्व मदत केली जय. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये.’ असेही नाना पाटेकरांनी सांगितले. याबरोबरच नानांनी इतर नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे.