पुणे -जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनां मध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. भोर तालुक्यातील नऱ्हे गावात भाटघर धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना खेड तालुक्यातील चासकमान धरणात घडली असून याठिकाणी पोहण्याकरिता पाण्यात उतरलेल्या चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच तरुणी गुरवारी दुपारी बारा वाजता पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत एक मुलगी सुदैवाने बचावली आहे.
भाटघर धरणाच्या न-हे गावत लग्नाकरिता आलेल्या असताना त्या धरणाच्या तीरावर पोहण्यासाठी गेल्या असताना ही दुर्घटना घडली आहे. खुशबू लंकेश रजपूत (वय १९ रा. बावदन), मनीषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी रा संतोषनगर हडपसर पुणे), मोनिका रोहित चव्हाण (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, गुरवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. रात्री पर्यंत चार मुलींचे मृतदेह मिळाले असून मनीषा लखन रजपूत हिचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून शोधकार्य सुरु आहे. नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणांनी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अंड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे.घटनेची माहिती मिळताच,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोहायला गेले अन् जीव गमावून बसले विद्यार्थी
खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे चास कमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेलेल्या सह्याद्री स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. गुंडाळवाडी येथील तिवई हिल येथे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल असून येथे निवासी विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी इ. १० च्या वर्गात शिक्षण घेते होते. उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विध्यार्थी सायं चार वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी व पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात गेले होते. शिक्षकांच्या सांगण्यानुसार काही विद्यार्थी कमरे एवढ्या पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आल्याने या लाटेत ६ ते ७ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या वेळी शिक्षकांनी तातडीने पोरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत काही विद्यार्थी तीरावर आणले मात्र. त्यातील ४ विद्यार्थी लाटे बरोबर खोल बुडाले.