रायगड आणि कणकवलीमध्ये आज पहाटेच भीषण अपघात झाले आहेत. रायगडमधील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कणकवली येथे झालेल्या अपघातात 4 जण दगावले आहे.आज पहाटेच दोन्ही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावर झाले. त्यामुळे महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच, महामार्गावर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात एकूण 9 प्रवाशी ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
5 महिन्यांचे बाळ बचावले
रायगडमध्ये रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा पहाटे 5 वाजताच समोरासमोर भीषण धडक झाली. मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक ( क्र. MH-43 /U/ 7119 ) व मुंबईकडून गुहागरकडे जाणाऱ्या इको गाडी ( क्र. MH- 48 BT8673) यांच्यामध्ये अपघात झाला.या गाडीतून प्रवास करणाऱ्या 9 जणांचा मृत्यू झाला. यात 4 महिला असल्याची माहिती आहे. तसेच, अपघातात 5 महिन्यांचे बाळ बचावल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अपघातात एक चार वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे. जखमी मुलाला जवळच्या उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिस व वाहतूक पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक तातडीने पूर्ववत केली.
कणकवलीत चौघांचा मृत्यू
कणकवलीत एक खासगी बस उलटून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक पहाटेच हादेखील अपघात झाला. अपघातात 23 जण जखमी झाले आहेत.कणकवली येथे पहाटे 4 वाजता खासगी स्लीपर बस उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघातदेखील मुंबई-गोवा महामार्गावरच घडला. कणकवली येथे वागदे पुलाजवळ ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईहून गोव्याला जात होती. कणकवलीत गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. यातील 4 जण ठार झाले आहेत. तर, 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.