शिर्डीला जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले असून यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री 15 बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युमुखी पडलेले बहुतांशी भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना असून एकाच वेळी गावातील तब्बल 10 जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. अंबरनाथहून नाशिकला निघालेल्या भाविकांच्या बसला आज पहाटे भीषण अपघात झाला होता. या अपघातात अंबरनाथच्या मोरीवली गावातील 10 जणांवर काळाने घाला घातल्याची माहिती मिळताच अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत
शिर्डीला जाताना झालेल्या बस अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जात असून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे. किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचबरोबर अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.