खासदार छत्रपती संभाजी राजे यांची माहिती
मुंबई – प्रतिनिधी
राज्यात जवळपास ४४५ किल्ले असून यातील फक्त ४५ किल्ले केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून ३३ किल्ल्यांचे संवर्धन केले जाते. मात्र उर्वरीत ३३२ किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. या सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी येत्या ११ फेब्रुवारी २०१९ रोजी रायगड किल्ल्यावर दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रायगड किल्ला विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.
या परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय पुरातत्व खाते, राज्य पुरातत्व खाते, वनविभाग आणि पोलिसा दलातील अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच एकत्रित आणण्यात येणार आहे. तसेच पर्यटन मंत्री जयकुमार रावल, रायगडचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह काही अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दुर्ग संवर्धन आणि जतनासाठी काम करणाऱ्या २०० शिवभक्तांच्या संघटनांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्वांच्या सूचना या परिषदेत ऐकून त्यानुसार किल्ल्यांचे संवर्धन आणि जतनासाठी काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रायग़ड किल्ला आणि परिसरासराठी ६०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी २८ कोटी रूपयांच्या फरसबंदीचे काम सध्या सुरु आहे. पन्हाळा, देवगिरी, शिवनेरी, सोलापूरचा भुईकोट किल्ला, सिंधूदूर्ग किल्ला यासह १५ किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्रीय वित्त आयोगाकडे १५० कोटी रूपयांची मागणी केली. यापैकी १० किल्ल्यासाठी पैसे देण्याचे वित्त विभागाने मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत रायगड किल्ल्यावरील ८०० पायऱ्यांच्या डागडूजीचे काम पूर्ण झाले आहे. आणखी ९०० पायऱ्यांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. याशिवाय रायगडावर संगीत व लाईट शोचे आयोजनही करण्यात येणार आहे. याशिवाय रायगडाच्या पायथ्याशी ८८ एकरच्या जमिनीवर छत्रपतीं शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वस्तूंचे वस्तु संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.