जळगाव – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मी व्यासपीठावर दाेन खुर्च्यांआड बसलाे आहाेत. वर्तमानपत्रात फाेटाे आेळी काय छापून येतील हे माहिती नाही. परंतु, आमच्या दाेघांमध्ये पुरस्कारार्थी शेतकरी दांपत्य बसले असून शेतकरी हाच आमच्या सरकारचा केंद्रबिंदू असल्याने आमच्यात काेणतेही अंतर पडलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. जळगाव येथे जैन हिल्सवरील आकाश मैदानावर भवरलाल अँड. कांताबाई जैन फाउंडेशन आयाेजित पद्मश्री डाॅ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण साेहळा शनिवारी आयाेजित करण्यात आला हाेता. त्यात ते बाेलत हाेते. व्यासपीठावर शरद पवार, प्रतिभा पवार, जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशाेक जैन, पद्मश्री ना. धाें. महानाेर आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमात नंदापूर (जि. जालना) येथील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. दरम्यान, हिंमत असेल तर आजच सरकार पाडा असे आव्हान ठाकरे यांनी मुक्ताईनगर येथे दिले.
सत्कारात ठाकरे-पवारांचे पहले आप, पहले आप; नंतर दोघांचा एकाच वेळी सत्कार
व्यासपीठावर सूत्रसंचालकाने सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वागत जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशाेक जैन हे करतील, अशी उद्घाेषणा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात नकार देत आधी पवार साहेबांचा सत्कार करण्याची विनंती केली. तर शरद पवारांनी प्राेटाेकाॅलप्रमाणे आधी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी दाेन वेळा ठाम नकार दिला. शेवटी शरद पवार आणि मुख्यमंत्री या दाेघांचा एकाच वेळी सत्कार करण्यात आला. भाषणात मुख्यमंत्र्यांनी प्रतिभा पवार यांचे आभार मानले. ते म्हणाले, आपण सार्वजनिक कार्यक्रमात जात नाहीत. परंतु, माझ्या शपथविधीपासून आपण सुरुवात केली. आज पुन्हा आपण एकत्र आलाे. तुम्ही असेच आमच्यासाेबत राहा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अपेक्षा : सरकारने पाण्यावर काम करावे
खासदार शरद पवार म्हणाले, राज्य आणि केंद्रातील सरकारने पाणी या विषयावर अधिक काम करण्याची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल, याचा विचार केला पाहिजे. उच्च तंत्राद्वारे शेती कशी करावी हे शेतकऱ्यांपर्यंत पाेहोचले पाहिजे. पद्मश्री भवरलाल जैन यांच्यानंतरदेखील त्यांचे शेतीतील कार्य सुरू असल्याचे समाधान आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहोत, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जाहीर व्यासपीठावरून थेट सरकार पाडून दाखवा असे आव्हान दिले आहे.
मुक्ताईनगरमध्ये बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “आमच्या तीन पक्षाचं सरकार व्यवस्थित सुरू आहे. पण विरोधकांच्या पोटात खुपतयं. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. आजच काय आत्ता सरकार पाडून दाखवा. माझे आव्हान आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ठाकरे म्हणाले की, ऑपरेशन लोटस काय तुम्हालाच लोटलं ना लोकांनी. असं म्हणून भाजपाच्या ऑपरेशन लोटसचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार फार काळ टीकणार नाही अशी टीका भाजपाने वारंवार केली. त्या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान देत हिंमत असल्यास उद्या नाही आजच महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवा असे म्हटले.
आपल्या भाषणात त्यांनी एकनाथ खडसे यांनाही टोला लगावला. मुक्ताई नगर आज मुक्त झाले आहे. कुणापासून ते तुम्हाला चांगलंच माहित आहे. तुम्हीच त्यांना बाजूला केलं. असं उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आता भाजपाचे नेते यावर काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.