नवी दिल्ली- रानी झांसी रोड परिसरातील अनाज मंडीमधील फॅक्टरीमध्ये लागलेल्या आगीत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेवर दुखः व्यक्त केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाहांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, केजरीवालांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश देत 7 दिवसात रिपोर्ट मागितली आहे.केजरीवालांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख आणि जखमींना 1 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच, दिल्ली भाजपाअध्यक्ष मनोज तिवारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख आणि जखमींना 25-25 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच, मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी (पीएमएनआरएफ) मधून 2-2 लाख रुपयांची मदत मृतांना आणि 50 हजारांची मदत जखमींना जाहीर केली आहे.
वरदळीच्या ठिकाणी असलेल्या या फॅक्टरीमध्ये स्कूल बॅग बनवल्या जातात. अग्नीशमन विभागाचे अधिकारी सुनील चौधरीने सांगितले की, फॅक्टीरमध्ये बॅग्स, बॉटल आणि इतर सामान होते, यामुळेच आग वाढली. ही फॅक्टीर खूप लहान बोळ्यांमध्ये असल्यामुळे बचाव कार्यामध्येही अडथळे निर्माण झाले.