त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेच्या वतीने कैलास मानसरोवर येथून आणलेले पवित्र जल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले., त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, सुधींद्र कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, दोन पवित्र जलांचा संगम हा दोन संस्कृतींचा संगम आहे. यामुळे एक नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. संस्कृतीचा हा संगम मानव कल्याणाच्या कार्याला प्रेरक ठरेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेला अनुसरुन प्रशासन आणि नागरिकांनी मिळून हा कुंभमेळा हरित कुंभ म्हणून साजरा केला. नाशिक-त्र्यंबकेश्वरला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने येथील स्वच्छतेचा विशेष उल्लेख केला आहे. स्वच्छतेच्या कार्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग क्वचितच पहायला मिळतो, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेने असे चांगले कार्य करुन दाखविले आहे, असे सांगून त्यांनी नागरिकांना या कार्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी कलशाचे विधीवत पूजन करुन त्यातील पवित्र जल कुशावर्त तीर्थात अर्पण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांचेसह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आ. बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रविण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक जे.जे. सिंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, सुधींद्र कुलकर्णी, नेमबाज पटू अंजली भागवत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, निमाचे पदाधिकारी उपस्थित होते.