पुणे – देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी सभागृहाबाहेर बाहेर पडताच आज (बुधवारी) दुपारी 4 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वारकरी सुखावले.
विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागलेले असंख्य वारकरी देहूमध्ये कालपासूनच दाखल झाले होते. संत तुकारामांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा झाली.यावेळी हर्षवर्धन पाटील, महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, बबन पाचपुते, माजी नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक नारायण भेलवाडे, चंद्रशेखर अहिरराव आदी उपस्थित होते.पालखी सोहळ्याच्या काल्याचे कीर्तन दिलीप देहूकर यांनी सकाळी केले. यंदा पाद्यपूजेतचा मान ज्येष्ठ वारकरी सूर्यभान पांडुरंग बोंबले यांना मिळाला होता. संपूर्ण देहूनगरी भक्तीरसात बुडाली असून विठ्ठलाच्या गजराने आसमंत दुमदुमला .मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिकाबेराबच शेतक-यांचे चेहरीही सुकून गेले होते. दरम्यान, आज (बुधवार) देहू येथून संत तुकोबांची पालखी आळंदीकडे रवाना झाली. पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखी गावाबाहेर पडताच जणू वरुण राजानेच तुकोबांना निरोप देत सरीवर सरी बरसवल्या. त्यामुळे आनंदाला पारावार उरला नाही. ही पालखी इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावणार आहे. पालखीच्या प्रस्थानाचे विधी पहाटे साडेचारपासून सुरू झाले. वारीच्या ओढीने लक्षावधी वारक-यांचा मेळा देहू-आळंदीत भरला होता