नवी दिल्ली: दिल्लीतील धान्य बाजार परिसरात असलेल्या कारखान्यांना लागलेल्या भीषण आगीत आता पर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळाले असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.
दिल्लीतील धान्य बाजार परिसरात ही आज (रविवार) पहाटे ५.२२ च्या सुमाराला लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिलीय. आगीची माहिती मिळताच गर्गही घटनास्थळी दाखल झाले.
पहाटे लागलेली ही आग आता पूर्णपणे विझली असल्याची माहिती दिल्ली उप अग्निशमन दल प्रमुख सुनील चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बचावकार्य सुरू असून या कामाला ३० अग्निशमन दलाचे बंब कार्यरत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.