पुणे: चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या हुवाई या चिनी कंपनीकडून पीएम केअर फंडाला सात कोटी रुपयांचा निधी आला आहे, असा आरोप करतानाच हा निधी कसा आला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चीनशी काय साटंलोटं आहे? याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला सात सवालही केले आहेत. हुवाई या चिनी कंपनीचे चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीशी संबंध आहे. ही कंपनी वादग्रस्त आहे. या कंपनीने पीएम केअर फंडाला सात कोटी रुपये दिले आहेत. टिकटॉक या चिनी कंपनीने ३० कोटी, पेटीएमने १०० कोटी, शाओमीने १५ कोटी, ओप्पोने १ कोटी रुपयांचा निधी पीएम केअर फंड किंवा पंतप्रधान निधीला दिला आहे. या कंपन्यांनी पीएम फंडाला निधी दिला का? तो कसा दिला? आदी प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व निधीचा हिशोब भाजपने लोकांसमोर मांडला पाहिजेत आणि चिनी कंपन्यांकडून निधी का स्वीकारला गेला याचा खुलासाही झाला पाहिजे, असं थोरात म्हणाले.
चीनच्या लष्कराशी संबंध असलेल्या हुवाई या चिनी कंपनीकडून निधी स्वीकारलाच कसा जातो? असा सवाल करतानाच चीनशी मोदींचं नेमकं साटंलोटं काय आहे? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान नॅशनल रिलिफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडाला वळवल्या का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. जोपर्यंत चीनबाबत पंतप्रधान बोलत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू, असंही ते म्हणाले. दरम्यान, राजीव गांधी फाऊंडेशनच्या निधीवरून भाजपने काँग्रेसला दहा प्रश्न केले होते. त्यानंतरच लगेचच काँग्रेसने चिनी कंपन्यांच्या निधीवरून भाजपला सात प्रश्न विचारल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजप थोरात यांच्या प्रश्नाला काय उत्तर देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे ७ सवाल
– हुवाई या चिनी कंपनीकडून पीएम केअर फंडाला ७ कोटी रुपये आले का?
– हुवाई कंपनीचे पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहेत का?
– शाओमी या चिनी कंपनीने याच फंडात १५ कोटी दिले का?
– पेटीएमने पीएम केअर फंडात १०० कोटी दिले का?
– टिकटॉक कंपनीने पीएम केअर फंडात ३० कोटी दिले का?
– ओप्पो कंपनीने पीएम केअरमध्ये १ कोटी दिलेत का?
– मोदींनी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडात वळवल्या का?
– २०१३मध्ये चीनने सीमेवर कुरापती केल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून निधी का घेतला?