पुणे-सरकार एफटीआयआय चे भगवेकरण करीत आहे असा आरोप तीव्र होत असताना ‘एफटीआयआयच्या नियामक परिषदेचे सदस्य होण्यात मला रस नाही,’ असं सांगत अभिनेत्री पल्लवी जोशीनं सरकारची ऑफर नाकारली आहे तसं पत्रच तिनं माहिती व प्रसारण खात्याला लिहिलं आहे.एफटीआयआयच्या Society Members पैकी राहुल सोलापूरकर , अनघा घैसास यांच्यासह काही नावांनाही विद्यार्थ्यांचा विरोध आहे तर दुसरीकडे आता अध्यक्ष पदासाठी अभिनेत्री विद्या बालन चा पर्याय सरकार विचारात घेण्याची शक्यता आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे
दरम्यान पल्लवी जोशी हिने म्हटले आहे कि , ‘एफटीआयआयचा भाग होणं मला निश्चितच आवडलं असतं. मात्र, सध्याच्या नकारात्मक वातावरणात ते योग्य वाटत नाही. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. संस्थेत कोणाची निवड केली जावी किंवा नको याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. माझ्या निर्णयाचा कोणाच्याही नियुक्तीशी संबंध नाही. प्रश्न विद्यार्थ्यांच्या समाधानाचा आहे. तेच खूष नसतील तर संस्थेत येण्याचा उपयोगच काय? कोणतीही कला नकारात्मक वातावरणात बहरू शकत नाही. तीन दिवसांपूर्वीच मी तसं संबंधितांना कळवलं आहे.’
एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र सिंह यांच्या नियुक्तीबरोबरच अन्य १२ कलाकारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. पल्लवी जोशी हिचाही त्यात समावेश होता. पण, गजेंद्र सिंह यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळं संस्थेत वादाचा अंक सुरू झाला आहे. सिंह यांच्या नियुक्तीला एफटीआयआयमधील डाव्या विचारांच्या व भाजपविरोधी विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. एफटीआयआयचे भगवेकरण करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत सिंह यांची निवड रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. चित्रपट क्षेत्रातील काही मंडळींचाही या मागणीला पाठिंबा आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर एफटीआयआय व संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आलेल्या अनेक नामवंत कलाकारांनी एफटीआयआयशी फारकत घेणं सुरू केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते जानू बरुआ, सिनेमॅटोग्राफर संतोष सिवान यांनी नुकताच एफटीआयआयच्या सदस्त्वापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता पल्लवी जोशी हिनंही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे.