मुंबई–भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानाचे देशाच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेषतः मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य करताना कथित भगव्या दहशतवादावर भाष्य केले होते. माझी व भाजप व काँग्रेसच्या लोकांना नम्र विनंती आहे की, कृपया भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. कारण, भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज (भगवा) आहे. भगवा रंग हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व वारकरी पंथाचा रंग आहे. तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कुणीही राजकीय लेबल लावू नका. म्हणायचेच असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे आता देशाच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते शनिवारी या प्रकरणी मुंबईत रस्त्यावर उतरले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. एवढेच नाही तर काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चाही काढला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्या शायना एन सी, मनिषा कायंदे, शितल म्हात्रे यांच्यासह विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
शिवसेना नेत्या शायना एन सी यांनी यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाविनाश आघाडी केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करते. हिंदूंचा अपमान करणे हेच त्यांच्या डीएनएमध्ये आहे, असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, ठाण्यातही युवा सेनेने आपले कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात या प्रकरणी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या हातात गर्व से कहो हम हिंदू है, चे फलक दिसून आले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. ते आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, ‘भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, भावनेचा आणि परंपरेचा विषय असल्याने भगवा शब्दाला दहशतवादाशी कुणीही जोडू नये’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मांडलेल्या या भूमिकेत चूक काय? योग्य भुमिकेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपा आणि शिंदे साहेबांच्या पक्षातील लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन करावं याचा आधी अभ्यास केला पाहिजे.
आंदोलन करायचंच असेल तर राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करतायेत.. शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, सरकारचा भ्रष्टाचार, बेलगाम सरकारचे बेफाम मंत्री या मुद्द्यांवर आंदोलन करा. शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या गोंधळलेल्या आणि काहीही काम नसलेल्या कार्यकर्त्यांना-नेत्यांना मार्गदर्शन करावं, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी बेलगाम सरकार, बेफाम मंत्री, मुद्द्यावर बोला, असे हॅशटॅगही वापरलेत.

