पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्किल इंडिया मिशनला यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांना उद्योगजगताकडून मिळणारा अनुकूल प्रतिसाद हा निश्चितच आशादायी आहे,असे मत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.
ते पिंपरी येथील टाटा मोटर्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करताना बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,टाटा मोटर्स सारखे उद्योगसमूह स्वतःच्या विकासासोबतच सातत्याने देशातील जनतेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीही महत्वपूर्ण योगदान देतात, म्हणूनच मेक इन इंडिया व स्किल इंडिया सारख्या महत्वाकांक्षी अभियानातही टाटा मोटर्सने घेतलेला पुढाकार हा वाखाणण्याजोगा आहे. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ऑटो कंपोनंट असेम्ब्ली फिटर’ या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या १६६ विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये ९४ मुले व ७२ मुलींचा समावेश आहे.
यावेळी बोलताना आपल्या मनोगतात टाटा मोटर्सचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर व कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर म्हणाले की, नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन अर्थात नीम योजनेअंतर्गत टाटा मोटर्स मध्ये जे विद्यार्थी कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत त्यांची कामाप्रती असलेली शिस्त, काम करण्याची शैली ही वेगाने प्रगतिपथावर आहे. दहावी, बारावी चे शिक्षण झाल्यानंतर कोणत्याही
प्रकारचे तांत्रिक कौशल्य नसतानाही ऑन द जॉब ट्रेनिंग पद्धतीने ही मुले- मुली आज कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे वाहन उत्पादन क्षेत्रातील अद्ययावत तांत्रिक कौशल्यामध्ये खूप कमी वेळात निपुण होत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे असेही बोरवणकर यांनी सांगितले.
यावेळी आपल्या मनोगतात टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी गजेंद्र चंडेल यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना सांगितले की, नीम सारख्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे युवकांना प्रत्यक्ष कंपनीत चालणारी कामकाज पद्धती जवळून पाहता येते,हाताळता येते व शिवाय त्या विषयाचे तांत्रिक ज्ञानही प्रशिक्षकांमार्फत शिकता येते, ही अतिशय परिणामकारक बाब आहे. विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी टाटा मोटर्सतर्फे प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवक युवतींना प्राधान्य दिले जाते असेही चंडेल यांनी सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सर्व प्रशिक्षकांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.अशाप्रकारचे प्रशिक्षण गुजरात राज्यातील सानंद येथील टाटा कंपनीच्या प्रकल्पामध्येही सुरु असून, मार्च २०१८ पर्यंत आणखी ५०० प्रशिक्षणार्थ्याचें प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगीं कल्याणी पुरोहित व अनंत मराठे या विद्यार्थ्यानीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व्ही. सुरेश, सीव्हीबीयु क्वालिटी हेड राजेश खत्री, सीव्हीबीयु प्लांट हेड आलोक सिंह, पीव्हीबीयू प्लांट हेड जयदीप देसाई,टाटा मोटर्सचे कौशल्य विकास विभाग प्रमुख श्रीनिवासन, कंपनीचे टॅलेंट एक्विझिशन हेड सुधांशु मिश्रा, पीव्हीबीयू वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका अनुराधा दास ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे अधिकारी संजीव तिवारी, अलका पांडे, ‘यशस्वी’ चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक राजेश नागरे यांच्यासह विविध पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टाटा मोटर्सचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व्ही. सुरेश यांनी, सूत्रसंचालन मनुष्यबळ व्यवस्थापक नेहा शिशुपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन पीव्हीबीयूचे कौशल्य विकास प्रशिक्षण विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी यांनी केले.